घरकुलाच्या सर्व्हेसाठी गट विकास अधिकारी थेट लाभार्थ्यांच्या घरी

31

 मूल:-प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे घरकुलासाठी राज्यभरात सर्वेक्षण सुरू आहे.घरकुलासाठी पात्र असलेला लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये यासाठी मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.एच.राठोड हे प्रत्येक ग्रामपंचायतीला जावून प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी भेट देत सर्व्हेक्षणाची पाहणी करीत आहेत.त्यामुळे आतापर्यंत मूल तालुक्यात तब्बल २ हजार एकशे ब्यांशी नागरिकांचा सर्व्हे झालेला असून घरकुलापासून वंचित असणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. देशातील कच्चे घर असलेल्या प्रत्येक नागरिकांना हक्काचे पक्के घर असावे यासाठी केंद्र सरकारने २५ जून २०१५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली.सर्वेक्षणाच्या माध्यमातून देशातील लाखो नागरिकांना लाभ दिला.मात्र घरकुलाच्या सर्वेक्षणामध्ये अनेक लाभार्थी तांत्रिक कारणास्तव लाभापासून वंचित राहिले.त्यामुळे घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेल्या व घरकुलासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे सध्या नव्याने सर्व्हेक्षण सुरू आहे.त्यामुळे मूल तालुक्यातील घरकुलासाठी पात्र असलेला एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये यासाठी मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गावे पिंजून काढत आढावा घेत आहे.अशातच तालुक्यातील जानाळा येथे शुक्रवारी लाभार्थ्यांच्या घरी भेट सर्व्हेक्षनाची माहिती घेतली.यावेळी जानाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना किन्नाके,सदस्य नीता विनायक निकोडे,ग्रामपंचायत अधिकारी दिलीप चौधरी उपस्थित होते.