तालुक्यातील पाच जणांचा बळी घेणाऱ्या त्या नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा महिला सरपंचाचे विभागीय वन अधिकाऱ्याला निवेदन

21

मूल:-तालुक्यातील पाच जणांचा बळी घेणाऱ्या दोन वाघांना जेरबंद करण्यात वन विभागाला अजूनही यश आले नाही. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.खरिप हंगाम तोंडावर असून अवकाळी पाऊस कोसळल्याने सध्या शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहे.मात्र जंगल शेजारी असलेल्या शेतात जाण्यास शेतकरी घाबरत असून शेती पडीत ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.त्यामुळे त्या दोन नरभक्षक वाघाला तत्काळ जेरबंद करा अशी मागणी महिला सरपंचांनी विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांना सोमवारी(दि.२)दिलेल्या निवेदनातून केली आहे. मूल तालुक्यातील अनेक गावे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत.त्यामुळे जंगलात हिंस्त्र वन्यप्राण्यांचे वावर मोठ्या प्रमाणात आहे.मागील वर्षभरात मूल तालुक्यात मानव वन्य प्राणी संघर्ष शिगेला पोचला असून वाघाच्या हल्ल्यात नाहक शेतकऱ्यांचा बळी गेला.मात्र मानव वन्य प्राणी संघर्ष टाळण्यासाठी कायम उपाय योजना करण्यात वनविभाग सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे.अनेकदा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून आश्वासन दिले जाते मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही.घटना घडून आठ दिवसांचा कालावधी लोटला मात्र त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले नाही.त्यामुळे त्या दोन्ही वाघांना तत्काळ जेरबंद करण्यात यावा अन्यथा गावकऱ्यांना घेवून वनविभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिला सरपंच यांनी निवेदनातून दिला आहे.यावेळी निवेदन देताना जानाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना राजेंद्र किन्नाके,टोलेवाही येथील सरपंच वैशाली निकोडे,करवन येथील सरपंच वंदना राजेंद्र पेंदोर व करवंन,जानाळा व टोलेवाही येथील नागरिक उपस्थित होते.