maharashtra lockdown : राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला!

88

मुंबई, 28 एप्रिल : राज्याला कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन (maharashtra lockdown) लावण्यात आला आहे. पण आता लॉकडाऊनचा अवधी वाढवण्यात आला आहे. 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणीच मंत्र्यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या निर्णयाबद्दल सहमती दर्शवली आहे.त्यामुळे राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची घोषणा 30 एप्रिल रोजी केली जाणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

सर्वांना मोफत लसीकरण

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले

‘गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरू आहे. आजतागायत 45 च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.