Home राष्ट्रीय PM Garib Kalyan Ann Yojana: संकट काळात मोदी सरकारचा मोठा निर्णय; जूनपर्यंत...

PM Garib Kalyan Ann Yojana: संकट काळात मोदी सरकारचा मोठा निर्णय; जूनपर्यंत मिळणार मोफत अन्नधान्य

130

नवी दिल्ली, 23 एप्रिल: देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदी सरकार (Modi Government)ने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मार्च 2020 मध्ये जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला (PM Garib Kalyan Ann Yojana) आता आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. जेणेकरुन कोरोनाच्या या संकट काळात (Corona Pandemic) गरीब आणि वंचित लाभार्थ्यांना अन्नधान्याची कमतरता भासू नये.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना मे आणि जून 2021 पर्यंत मोफत अन्नधान्याचा पुरवठा (free food-grains) करण्यात येणार आहे. म्हणजेच मे आणि जून 2021 या महिन्यांत गरीब लाभार्थी नागरिकांना 5 किलो मोफत धान्य दिले जाणार आहे. या योजनेमुळे जवळपास 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य मिळून त्याचा लाभ मिळेल.

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशभरात पहायला मिळत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. अशा या संकटाच्या परिस्थितीत गरीबांना झळ बसू नये यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र सरकार 26,000 कोटींहून अधिक रुपये खर्च करणार आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी लाभार्थ्यांना पाच किलो गहू आणि तांदुळासह एक किलो चणे देण्यात येत आहेत.

योजना पुन्हा राबवण्याची केली होती मागणी

काही दिवसांपूर्वीच राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवण्याची मागणी केली होती. महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांसाठी योजना पुन्हा राबवण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली होती.