3 मिनिटांचा उशीर झाल्याने सत्ता गेली, सदस्य पर्यटनाला, बहुमत नसूनही विरोधकांची सत्ता

93

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीत बहुमत असलेल्यांनी विलंब केल्यामुळे सत्ता गमवाल्याचा प्रकार समोर आला आहे. चंद्रपुरातील गोंडपिपरी तालुक्यातील तारडा ग्रामपंचायतीत हा प्रकार घडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 3 मिनिटाचा उशीर झाला आणि सत्ता गमवल्याची घटना घडली आहे.

चंद्रपुरातील गोंडपिपरी तालुक्यातील तारडा ग्रामपंचायतीत बहुमत असलेल्यानी विलंबामुळे सत्ता गमावली आहे. यात 7 सदस्यांच्या ग्रामपंचायतीत 4 सदस्य पर्यटनाला गेले होते. मात्र त्याचवेळी 3 विरोधी सदस्यांनी वेळेत अर्ज भरले आहे. मात्र 3 मिनिटे उशिरा आलेल्या सदस्यांना अर्ज भरण्यास नकार देण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी केवळ एकच अर्ज आल्याने अविरोध सरपंच घोषित झाले आहे.

अवघ्या 3 मिनिटांच्या फरकाने सरपंच पद हुकल्याचा अजब प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील तारडा ग्रामपंचायतीत झाला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तारडा ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक होती. सोमवारी दुपारी 12 पर्यंत यासाठी अर्ज दाखल करायचा होता. यात 3 सदस्यांच्या अल्पमत पॅनलने आपले सरपंच-उपसरपंचपदाचे अर्ज वेळेत दाखल केले.

 

चंद्रपूर तारडा ग्रामपंचायतीतील नवे सरपंच

मात्र 7 सदस्यीय ग्रामपंचायतीत बहुमत असलेला 4 सदस्यीय गट सहलीला गेला होता. या गटाकडून माया गोंगले यांना सरपंचपदासाठी उमेदवार अर्ज दाखल करायचा होती. मात्र सरपंच आणि उपसरपंचपदाचा अर्ज दाखल करण्यासाठी ते ग्रामपंचायतीत 12 वाजून 3 मिनिटांनी पोहोचले. हे सदस्य अर्ज भरण्यासाठी 3 मिनिटे उशिरा पोहोचले. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज भरू दिला नाही.

यामुळे केवळ 3 सदस्य असलेल्या शिवसेना समर्थित गटाला सरपंच आणि उपसरपंच पद निवडणूक न लढताच आयते अविरोध मिळाले. शिवसेना समर्थित पॅनलकडे अवघे 3 सदस्य असताना देखील तरुण उमरे यांना सरपंच पद मिळालं आहे. राजकारणात वेळेला किती महत्व असतं आणि अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने काय अनर्थ घडू शकतो हे या उदाहरणाने दाखवून दिलं आहे.