जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी आज रस्त्यावर

68

जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी आज रस्त्यावर

चंद्रपूर : ओबीसींचे संवेधानिक हक्क अधिकार मिळण्यासाठी तसेच ओबीसीच्या जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी संविधान दिनी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ओबीसींचा चंद्रपुरात विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात दीक्षाभूमी परिसर व शहरात पथसंचलन करण्यात आले.
चंद्रपुरातील दीक्षाभूमी परिसरातून हा मोर्चा निघणार आहे. शहरातील विविध मार्गावर फिरल्यानंतर चांदा क्लब ग्राऊंडवर या मोर्चाचा समारोप होणार आहे. दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजबांधवांमध्ये बुधवारपासूनच उत्साहाचे वातावरण आहे. अनेक गावातून बुधवारी मोटारसायकल रॅली काढल्या.
काहींनी नियोजनाच्या बैठका घेतल्या. यासंदर्भात ओबीसीसमन्वय समितीने पूर्ण तयारी केली आहे. कोरोना नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. मोर्चामध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ५०० व्हॉलेंटिअर्सची चमू राहणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, अ‍ॅड. दत्ता हजारे, बळीराज धोटे, डॉ. राकेश गावतुरे, प्रा. सूर्यकांत खनके, प्रा. विजय बदकल, प्रा. विजय मुसळे यांनी दिली.

दीक्षाभूमी परिसर सज्ज
गुरुवारी दीक्षाभूमी परिसरातून ओबोसींचा मोर्चा निघणार आहे. यानिमित्त दीक्षाभूमीवर बुधवारीच संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. दीक्षाभूमीच्या पटांगणावर ओबीसी बांधव गुरुवारी सकाळपासूनच एकत्र येऊ लागतील. त्यानंतर ६ -६ च्या रांगेत मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा रामनगर, जटपुरा गेट ते जयंत टॉकीज- गांधी चौकातून डावीकडे वळण घेत सराफा लाईन मार्गे कस्तुरबा चौक येईल. येथून डावीकडे वळण घेत मार्गे जटपुरा गेट मार्गे प्रियदर्शिनी चौकातून चांदा क्लब ग्राऊंडवर जातील.

मोर्चाला विविध संघटनांसह राजकीय पाठिंबा
जातीनिहाय जनगणनेसाठी होत असलेल्या या मोर्चाला पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांनी समर्थन दिले आहे. या मोर्चात प्रत्येक ओबीसी बांधवाने सहभागी व्हावे, असेही आवाहनही त्यांनी केले आहे. या मोर्चाला यंग चांदा ब्रिगेडनेही पाठींबा दिला असून मोर्चा दरम्यान मोर्चात सहभागी होणाºया मोर्चेकरुंना गांधी चौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष आ. किशोर जोरगेवार यांनी सांगितले. यासोबतच मोर्चाला सत्य शोधक समाजानेही समर्थन दिले आहे, अशी माहिती समाजाचे अध्यक्ष हिराचंद बोरकुटे यांनी दिली.

वाहतूक व्यवस्थेत केला असा बदल
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळात बदल करण्यात आला आहे. बसस्थानक ते कस्तुरबा चौक आणि गांधी चौक ते प्रियदर्शिनी चौकातील वाहतूक बंद राहील. सोबतच वरोरा नाका मार्गे संत कवलराम चौकातून दवा बाजारमार्गे जटपुरा गेटपर्यंत येणाऱ्या वाहनांवरही बंदी घालण्यात आली आहे. नागपूर मार्गे बल्लारपूर, मूलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहो वरोरा नाका उड्डाण पुलावरून सावरकर चौक ते बंगाली कॅम्प मार्गे जातील. या दोन्ही येणारी वाहने याच मार्गाने नागपूर मार्गे जातील. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवाशांनी नागपूर, वणी, घुग्घुस, गडचांदूरकडे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना रहमत नगर, नगीना बाग, दाताळा मागार्चा पर्याय खुला राहील.

११०० पोलिसांचा चोख बंदोबस्त
कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी मोर्चाच्या मार्गाची पाहणी केली. शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सहा पोलीस उपविभागीय अधिकारी, जिल्हातील विविध ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि हजारो पोलिसांची फौज मोचार्साठी तैनात करण्यात केली. बंदोबस्तासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह सहा पोलीस उपअधीक्षक, १५ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे १०० अधिकारी, ९०० पोलीस शिपाई व दंगा नियंत्रण पथक तैनात असणार आहे.