मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवास व्यवस्थेत मोठा डिजिटल बदल होत असून आता प्रवाशांना तिकीटाऐवजी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरता येणार आहे. रोख व्यवहार कमी करून प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ही योजना लागू करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
एसटी महामंडळाने पारंपरिक तिकीट पद्धतीला पर्याय देत NCMC प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्डद्वारे प्रवाशांना सवलतींची अचूक नोंद, रोखविरहित व्यवहार आणि प्रतिपूर्तीची स्पष्ट प्रक्रिया एकाच माध्यमातून मिळणार आहे. विविध सामाजिक सवलती घेण्यासाठी भविष्यात हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार असल्याचेंही मंत्री
सरनाईक यांनी स्पष्ट केले. त्यानुसार लवकरच राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये कार्ड नोंदणी मोहीम सुरू होणार असून प्रवाशांना बसस्थानकांवरच सहज अर्ज करता येणार आहे.
या स्मार्ट कार्डचा लाभ
विविध प्रवासी गटांना देण्यात येणार आहे. शालेय आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्र्यांना सरल क्रमांकाशी जोडलेले कार्ड मिळेल. ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना आधार संलग्न कार्ड दिले जाणार आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी यूडीआयडी क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड उपलब्ध होणार
आहे.
स्वातंत्र्य सैनिक,
अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयांमार्फत कार्ड
वितरित केले जाणार आहेत. कार्डची किंमत नवीन कार्डसाठी १९९ रुपये असून जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत कार्ड मिळेल. किमान १०० रुपये वॉलेट बॅलन्स आवश्यक असेल आणि ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येईल. तसेच ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अॅप किंवा नियुक्त एजंटकडून रिचार्जची सुविधा असेल. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी बसस्थानकांवरच नोंदणीची सोय करण्यात आली असून महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ३,००० हून अधिक एजंट नेमण्यात आले आहेत.






