Home आपला जिल्हा Breaking News मूल येथे एमपीएससी (कृषी) परीक्षे करिता व्याख्यानाचे आयोजन

मूल येथे एमपीएससी (कृषी) परीक्षे करिता व्याख्यानाचे आयोजन

64

कृषी महाविद्यालय, मूल येथील प्लेसमेंट सेल व कॉम्पिटिटिव्ह फोरम  अंतर्गत  “एमपीएससी (कृषी) परीक्षेची तयारी” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानासाठी तालुका कृषी कार्यालय, मूल  येथे कृषी अधिकारी  म्हणून कार्यरत असलेले श्री. शुभम किरमिरवार हे व्याख्याते म्हणून उपस्थित होते. व्याख्यान सत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी भूषविले. सदर व्याख्यान कार्यक्रमास उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक  डॉ. आर. पी. गजभिये हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. गितांशु डिंकवार, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, यांनी कार्यक्रमाचे  प्रास्ताविक सादर करत प्लेसमेंट सेल व कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत विध्यार्थ्यांना अवगत केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. शुभम किरमिरवार यांनी कृषी एमपीएससी परीक्षेची रचना, अभ्यासक्रम, तयारीचे नियोजन, योग्य अध्ययन तंत्र आणि यशस्वी उमेदवारांची अध्ययन पद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वत:ची प्रश्नमंजुषा तयार करावी त्यासाठी खूप अभ्यास करावा. प्रत्येक परीक्षेच्या मागे न लागता अगोदर संपूर्ण अभ्यासक्रम वाचून काढावा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक परीक्षांमध्ये तुम्हाला यश संपादन करण्यास निश्चित मदत होईल असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन, मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि योग्य संदर्भ साहित्य यांचा योग्य वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले. डॉ. आर. पी. गजभिये यांनी स्पर्धा परीक्षेकरिता प्रचंड इच्छाशक्ती, मानसिक तयारी, सकारात्मक दृष्टीकोन व सातत्यपूर्ण  स्वअवलोकन यांची महत्त्वपूर्ण भूमिका विद्यार्थ्यांपुढे उलगडली. त्यांनी विविध क्षेत्रात महान कार्य केलेल्या व्यक्तीमत्वांचे उदाहरण देत, विद्यार्थ्यांना परिस्थितीची जाणीव ठेऊन अभ्यासाला लागावे असा संदेश दिला. 

आपल्या प्रेरणादायी अध्यक्षीय भाषणात डॉ. अतकरे यांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनातील मुद्दे आत्मसात करून भविष्यातील करिअर घडवावे असे सांगितले. कृषी शाखेचे सखोल ज्ञान स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना वेगळेपण देऊ शकते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. अनावश्यक व्यत्यय व सोशल मीडियापासून दूर राहून नियमित अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. महाविद्यालयात आयोजित होणाऱ्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीला चालना मिळते आणि स्पर्धात्मक क्षमताही वृद्धिंगत होते, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मृदा विज्ञान विभागाचे सहायक प्राध्यापक श्री. नागेश नवघरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. गितांशु डिंकवार यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण सहभागीत्त्व आणि अतिथी वक्त्यांचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी व उपयुक्त ठरला.