Home आपला जिल्हा Breaking News नगरपरिषदेसाठी शनिवारीही उमेदवारी अर्ज स्वीकारणार

नगरपरिषदेसाठी शनिवारीही उमेदवारी अर्ज स्वीकारणार

62

मुंबई : प्रतिनिधी
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे सादर(अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत(प्रिंटआऊट) घेऊन व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिका-याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे असे स्पष्टिकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. तसेच शनिवारी शासकीय कार्यालयाला सुट्टी असली तरी उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील असेही आयोगाने सांगितले आहे.

राज्यातील ३४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. परिपूर्ण माहिती भरल्यानंतर संकेतस्थळावरून त्याची मुद्रित प्रत काढून त्यावर उमेदवाराची स्वत:ची व सूचकांची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्या मूळ प्रतीसह अन्य आवश्यक कागदपत्रांचा (उदा. नगरपरिषद/नगरपंचायतीचे नादेय प्रमाणपत्र, शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र, निवडणुकीसाठी बँक खात्याचा तपशील, राखीव जागांवरील उमेदवार असल्यास जातप्रमाणपत्र, पक्षाचा उमेदवार असल्यास ‘जोडपत्र- १’ किंवा ‘जोडपत्र- २’ इत्यादी) संपूर्ण संच विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिका-याकडे दाखल करणे बंधनकारक आहे. काँग्रेसने याला विरोध करताना ऑनलाइन अर्ज घेण्याची पद्धत किचकट असल्याने ती बंद करावी अशी मागणी केली होती.

याबाबत स्पष्टीकरण करताना इच्छूक उमेदवारांना नोंदणीसाठी सुरुवातीपासून सुरू केलेले संकेतस्थळ १७ नोव्हेंबरपर्यंत २४ तास सुरू असेल. त्यावर इच्छूक उमेदवारांना कोणत्याही वेळी नोंदणी करता येते व नोंदणी करताना तयार केलेला लॉगीन आयडी व पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवावा लागतो. कारण नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी ते आवश्यक असते. सही केलेल्या प्रिंटआऊटसह आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांचा संच संबंधित निवडणूक निर्णय अधिका-याला विहित मुदतीत म्हणजे सादर करणे आवश्यक आहे. १५ नोव्हेंबर या सुटीच्या दिवशीसुद्धा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात यावेत, अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. मात्र रविवारी १६ तारखेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. इच्छूक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचेही निर्देश सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींना देण्यात आले आहेत असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.