मोठी बातमी; राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार

58

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत मोठा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची चर्चा सुरू होती.

यासंदर्भात आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली असून राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आज उदय सामंत यांनी मंगळवारी यासंदर्भात सविस्त बैठक झाल्यानंतर निर्णय जाहीर केला आहे. सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी कोरोनाबाधित असतील, तर त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे. खासगी विद्यापीठांनी देखील याच निर्णयाचे पालन करायला हवे, असे ते म्हणाले.

सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांशी निगडीत वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन आणि निश्चित कालावधी देऊन वसतीगृह देखील बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सर्व विद्यापीठांनी करावी. पण जे विद्यार्थी परदेशातून आपल्या राज्यात आले आहेत, त्यांची वसतीगृहाची सुविधा बंद करण्यात येऊ नये, असे उदय सामंत म्हणाले.