हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त करावा- काँग्रेसची मागणी

56

मूल (प्रतिनिधी)
तालुक्याचा विविध भागात झालेल्या वाघांच्या हल्ल्यात यावर्षी पाच जणांचा मृत्यु झाला असून चालु झालेल्या शेतीच्या हंगामात जंगला लगतच्या शेतक-यांना भिती वाटू लागली आहे. त्यामूळे तालुक्यात वाढलेल्या वाघांचा तातडीने बंदोबस्त करून जनतेला संरक्षण दयावे. अशी मागणी तालुका काॅंग्रेसच्या पदाधिका-यांनी पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांचे कडे केली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेला मूल तालुका ५० टक्के जंगलाने व्याप्त असून यातील बहुतांश भाग बफर झोन मध्यें समाविष्ठ आहे. त्यामूळे मागील काही महिण्यांपासून तालुक्यातील अनेक गावांत वाघांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी तालुक्यात आगडी येथील कल्पना वाढई, जानाळा येथील वनिता गेडाम आणि किर्तीराम कुळमेथे, मारोडा येथे मनोहर प्रधाने आणि सुशी येथील वैशाली मांदाडे अश्या पाच जणांवर वाघाने हल्ला केल्याने त्यांना जीव गमवावा लागला आहे. तालुक्यात घडलेल्या या पाच घटनांमूळे जंगला लगतच्या गावांत भितीचे वातावरण पसरले आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला असून शेतीच्या मशागती करीता शेतक-यांना शेतावर जावे लागत आहे. तालुक्यात वाघांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याने जंगला लगतच्या शेतामध्यें जाण्यासाठी शेतक-यांना भिती वाटू लागली आहे. तसेच स्वयंपाका करीता सरपन गोळा करण्यासाठी जाणा-या गरीब महिलांमध्येंही वाघाची दहशत निर्माण झाली आहे. त्यामूळे शेतीच्या हंगामात शेतीची मशागत करायची कशी आणि स्वयंपाका करीता सरपना अभावी चुल पेटवायचीकशी असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी व महिला भगिनींना पडला आहे. त्यामूळे तालुक्यातील जंगला लगतच्या गावांत वाढलेले वाघांचे हल्ले कमी करण्यासाठी वन विभागाने योग्य उपाय योजना करून शेतकरी आणि महिलांना संरक्षण दयावे. अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांचे नेतृत्वात काॅंग्रेसच्या शिष्टमंडळाने नाम.विजय वडेट्टीवार यांचे कडे केली आहे. भेटलेल्या शिष्टमंडळात काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, बाजार समिती संचालक तथा सरपंच अखील गांगरेड्डीवार, नवनियुक्त शहरअध्यक्ष सुनिल शेरकी, नगरसेवक विनोद कामडे, सुरेश फुलझेले, कैलास चलाख, रूमदेव गोहणे आदि उपस्थित होते.