कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत, लवकरच येत आहे मे पासून ऑनलाईन अर्ज

59

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात हातावर पोट असलेल्यांचं मोठं नुकसान होणार. त्यामुळे हातावर पोट असलेल्या लोकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजातील काही घटकांना मदत देण्याची घोषणा केली. त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांचा समावेश करणात आला. त्यानुसार आता परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून 1 हजार 500 रुपये अर्थ सहाय्य केलं जाणार आहे. (Financial assistance to licensed rickshaw Drivers)

परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून 1 हजार 500 रुपये एवढे अर्थ सहाय्य देण्याबाबत 19 एप्रिल 2021 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रिक्षा चालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक आणि आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. सदर माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल.

याबाबत कार्यप्रणाली ICICI बँकेमार्फत विकसित करण्यात आली आहे. त्याबाबतची चाचणी अंतिम टप्यात आहे. 22 मे 2021 पासून रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील रिक्षा संघटना प्रतिनिधींना अर्ज प्रक्रियेबाबत ऑनलाईन सादरीकरण 21 मे 2021 रोजी करण्यात येणार आहे. रिक्षा चालकांच्या अर्थ सहाय्यासाठी शासनाकडून संपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय. ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांना एक वेळचे अर्थसहाय्य त्यांच्या संबंधीत बँक खात्यात त्वरित जमा होणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.