महाराष्ट्रात 16 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीने भरती

45

मुंबई – करोनाने लोकांचे जीवन तसेच उद्‌ध्वस्त करून ठेवले आहे. करोनाची दुसरी लाटच जीवघेणी ठरली आहे. त्यातच आज केंद्र सरकारने तिसऱ्या लाट नक्की येणार असल्याचे स्पष्ट केले. देशातील करोनाची दुसरी लाट थांबायचे नाव घेत नाही आहे. या दरम्यान, केंद्र सरकारने करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड, रेमडेसिविर अशा सर्वच कमतरता असणाऱ्या गोष्टींवर काम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. मात्र, त्यासोबतच तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य सेवेतील कर्मचारी, तज्ज्ञ आणि डॉक्टर-नर्सदेखील पुरेशा संख्येत असणं आवश्यक आहे.

यामुळे राज्यातील वाढत्या करोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत असल्यामुळे करोनाचा अधिक सक्षमपणे सामना करता येईल असं सांगितलं जात आहे.

राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.