IPL 2021 : यंदाचा मोसम स्थगित; बीसीसीआय, संघांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता

30

भारतामध्ये कोरोनाचा कहर असतानाही इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम सुरक्षितरित्या पूर्ण होऊ शकेल असा बीसीसीआयला विश्वास होता. मात्र, सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू, तसेच चेन्नई सुपर किंग्सच्या काही सदस्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर मंगळवारी आणखी दोन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोनाचा हा धोका लक्षात घेऊन अखेर बीसीसीआयने यंदाचा आयपीएल मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बीसीसीआय आणि आठही संघांना या निर्णयाचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. केवळ तेच नाही, तर प्रसारक स्टार स्पोर्ट्स आणि जाहिरातदारांचेही आर्थिक नुकसान होणार आहे. या स्पर्धेतून बीसीसीआयला सर्वाधिक महसूल मिळतो. आयपीएल न झाल्यास आमचे तब्बल ४०० कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली मागील वर्षी म्हणाला होता. यंदा आयपीएलचे ६० पैकी केवळ ३० सामनेच होऊ शकेल. त्यामुळे बीसीसीआयचे ४०० कोटींचे नसले, तरी मोठे आर्थिक नुकसान होणार हे निश्चित आहे. त्यातच कोरोनामुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नसल्याने आधीच बीसीसीआयला फटका बसला होता.

संघांची ब्रँड व्हॅल्यू घसरली

आयपीएलच्या लोकप्रियतेमुळे जाहिरातदार या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. आयपीएलच्या सामन्यांदरम्यान आपली जाहिरात दाखवली जावी यासाठी ब्रँड्स बरेच पैसे खर्च करतात. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या २२ सामन्यांमध्ये जाहिरातींचे प्रमाण २ टक्क्यांनी वाढले होते. मात्र, आता त्यांचेही नुकसान होणार आहे. तसेच संघांची ब्रँड व्हॅल्यू मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाली होती. त्यामुळे आठही फ्रेंचायझीना आणखी मोठा फटका बसणार आहे.