Big Breaking : देशात १८ वर्षांवरील सर्वांना लस; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

40

नवी दिल्ली – देशात करोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असतानाच केंद्र सरकारने आज लसीकरण मोहिमेबाबत मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने आज याबाबतची घोषणा करताना १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल असे जाहीर केले. याबरोबरच लस उत्पादकांना ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारने आज जाहीर केल्याप्रमाणे देशभरात १ मेपासून करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या या टप्प्यामध्ये १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येईल. यापूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यकर्मी, फ्रंटलाईन वर्कर्स यांचे लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिक व इतर गंभीर व्याधी असलेल्यांना लस देण्यात आली.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काही औषध कंपन्यांसोबत बैठक घेतली होती. यामुळे आता देशातील लसीकरण मोहीमेस आणखी वेग येणार असल्याचे दिसत आहे.