फक्त 55 रुपयांच्या बचतीवर वर्षाला 36 हजार मिळणार, पीएम किसान मानधन योजनेसाठी 21 लाख शेतकऱ्यांची नोंदणी

87

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर पेन्शन रुपात दरमहा 3 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारचं या योजनेमध्ये 11 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची मागणी आहे. आतापर्यंत 21 लाख 25 हजार 926 शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे. या योजनमध्ये 18 ते 40 वयोगटामधील शेतकरी सहभागी होऊ शकतात. पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाची 60 वर्ष झाल्यानंतर वार्षिक 36 हजार रुपये मिळतील. शेतकऱ्याच्या वयानुसार त्यांना प्रिमियम भरावा लागेल. ही रक्कम 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत आहे. (Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana PM-KMY 21 lakh farmers registered for pension scheme know full details)

पीएम किसान मानधन योजनेसाठी नोंदणी कुठे करायची?

पीएम किसान मानधन योजनेमध्ये एखाद्या शेतकऱ्यानं वयाच्या 18 व्यावर्षी नोंदणी केल्यास त्याला दरमहा 55 रुपये म्हणजेच वार्षिक 660 रुपये भरावे लागतील. तर, 40 व्या वर्षी योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा 200 प्रमाणं वार्षिक 2400 रुपये भरावे लागतील. कॉमन सेवा केंद्रामध्ये जाऊन शेतकरी या योजनेसाठी नोंदणी करु शकतात. नोंदणीसाठी दोन फोटो, बँक पासबूक झेरॉक्स आवश्यक असते. यासाठी कसलेही नोंदणी शुल्क लागत नाही. नोंदणी दरम्यान शेतकरी पेन्शन कार्ड बनवलं जातं.

 

पीएम किसान मानधन योजना मध्येच सोडल्यास काय?

केंद्र सरकारच्या माहितीनुसार पीएम किसान मानधन योजना मध्येच बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. संबंधित शेतकऱ्याचे पैसे बुडणार नाहीत. शेतकऱ्याला बचत खात्याच्या व्याजदराप्रमाणं व्याज देऊन ती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

पीएम किसान मानधन योजना

पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेता येतो. केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांची सर्व माहिती असते त्यामुळे वेगळी कागदपत्रं जमा करावी लागत नाहीत. किसान सन्मान योजनेच्या मिळणाऱ्या 6 हजार रुपयांमधूनचं किसान मानधन योजनेचा प्रीमियम कापला जातो. ही प्रक्रिया सुरु राहिल्यास शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात.