भारत बंदच्या समर्थनार्थ मूल तालुका काॅग्रेस कमेटीच्या वतीने स्थानिक गांधी चौकात धरणे आंदोलन

37

मूल (प्रतिनिधी)
केंद्र शासनाने लागु केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे, या मागणीच्या पुर्ततेसाठी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ मूल तालुका काॅग्रेस कमेटीच्या वतीने स्थानिक गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यांत आले. स्थानिक गांधी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाला मार्लापण करून आंदोलनाची सुरूवात झाली. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी जि.प. अध्यक्ष संतोष रावत यांचे नेतृत्वात तालुक्यातील शेकडो काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या 3 शेतकरी विरोधी कायदया विरूध्द घोषणाबाजी केली. यावेळी मार्गदर्शन करतांना संतोष रावत यांनी केंद्र सरकारने केलेले कृषी विषयक कायदे हे शेतक-यांवर अन्याय करणारे असून या कायदया विरूध्द पंजाब, हरीयाणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आदि राज्यातील शेतकरी चार महिण्यांपासून आंदोलन करीत आहेत. परंतू केंद्र शासन शेतक-यांच्या या आंदोलनाची दखल न घेता याउलट शेतक-यांचे आंदोलन दडपण्याचे कारस्थान करीत आहेत. ही बाब लोकशाही प्रधान भारत देशाला काळीमा फासणारी असल्याचा आरोप केला, योगायोगाने आंदोलनात सहभागी झालेले जि.प.चे माजी अध्यक्ष सतिश वारजुरकर यांनी दिल्लीच्या सिमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यान आजपर्यंत चारशेच्या जवळपास शेतक-यांचे मृत्यु झाले, अन्याय सहन न झाल्याने त्याचे लाल किल्यावर तिव्र पडसादही उमटले, याची दखल न घेता केंद्र शासन शेतक-यांशी सकारात्मक चर्चा न करता त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे.

या अन्यायकारक कृतीचा शेतकरी भविष्यात नक्कीच वचपा घेतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी तालुका काॅंग्रेसचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर, कोठारी येथील विनोद बुटले, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष राकेश रत्नावार, बाजार समितीचे उपसभापती संदीप कारमवार, संचालक अखील गांगरेड्डीवार, शांताराम कामडी, माजी सभापती वैशाली पुल्लावार,  महिला काॅंग्रेसच्या अध्यक्षा रूपाली संतोषवार, नगरसेवक विनोद कामडी, ललीता फुलझेले, युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष पवन निलमवार, व्यंकटेश पुल्लावार, विवेक मुत्यलवार, किसान आघाडीचे रूमदेव गोहणे, कैलास चलाख, राजु मारकवार, सुनिल गुज्जनवार, स्वागत वनकर यांचेसह काॅंग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.