पालकांमध्ये व्यक्त होत आहे चिंता @सोशल मीडियाचा अतिवापर ठरतोय बेरोजगारीचे कारण

63

तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात एकीकडे मजूर मिळत नसतानाच दुसरीकडे अनेक तरुण कोणतेही काम न करता दिवसभर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहत असल्याचे चित्र आहे. यामुळे बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. युवाशक्ती दिवसभर मोबाइलमध्ये गुंतल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थी व तरुण दिवसभर मोबाइलवर नेट वापरत असल्यामुळे ते बेरोजगार असल्याची जाणीवदेखील होत नाही. अँड्रॉइड मोबाइलमध्ये विविध ऑनलाइन गेम, व्हॉट्सअॅप, फेसबुक व इतर वेगवेगळ्या ॲप्ससह लुडोसारखे मोबाइल खेळ कट्ट्यावर खेळताना तरुण दिसत आहेत.

आजचे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग असून,
यासाठी इंटरनेट ही आवश्यक बाब झाली आहे. व्यवहारात पारदर्शकता यावी, म्हणून प्रत्येक व्यवहार हा ऑनलाइन झाला. मात्र यातील चांगल्या बाबी न घेता तरुण व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या विळख्यात अडकले आहेत. सोशल मीडिया फक्त करमणुकीसाठी वापर करीत असल्यामुळे पालकांतून चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या अँड्रॉइड मोबाइलचे भाव गगनाला भिडले आहेत.

प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसत आहे. त्यात इंटरनेट जोडल्यावर मोठ्या प्रमाणात करमणुकीच्या चित्रफीती पाहायला मिळत असल्याने त्यावर तरुण फिदाझाले आहेत. पाल्यांना शिक्षणात मदत व्हावी, या हेतूने पालकांनी त्यांच्या हातात मोबाइल दिला. मात्र शिक्षणासाठी उपयोग न करता व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुकवर तासनतास वेळ घालवत आहे. इंटरनेटच्या अतिवापराचा त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे.
आजचे युगात इंटरनेट ही आवश्यक बाब आहे. तरुणांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक आदींवर वेळ वाया न घालवता त्याचा उपयोग शिक्षणासह करिअर किंवा व्यवसाय वाढविण्यासाठी कसा करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
 मोबाइल गेममध्ये अडकली तरुणाई
मोबाइल हा सर्वसामान्यांपासून तेउच्चभ्रू सर्वासाठीच जिव्हाळ्याचा बनला आहे आणि त्यातील गेम म्हटले तर सांगूच नका. कारण या गेमने आजच्या तरुण मंडळींचा चांगलाच गेम केला आहे. गेम मनोरंजनाचे साधन आहे. मोबाइलच्या गेमने शारीरिक कसरतीचे खेळच हद्दपार केलेत. आजकाल कुठेही मोबाइल गेम जास्त चालतो. कारण गावाकडील शहरात शिकणारे काही तरुण गेम खेळण्यासाठी गावाच्या तीन किमी दूर जातात. कारण हा गेम खेळायला इंटरनेट लागते आणि गावात नेटवर्कच उपलब्ध नसते.