अतिवृष्टीमुळे व इतर कारणांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्याकरिता मुल तालुका काँग्रेसने दिले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले निवेदन

44

मुल:तालुक्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्याने धानाचे रोप पूर्णतः सडून गेल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली तर काही शेतकऱ्यांचे रोवलेले धानाचे पीक पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तर अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरांची व जनावरांच्या घोठ्यांची पडझड झाली असल्याने त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे याची दखल घेऊन झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावे यासाठी मुल तालुका काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थीतीची पाहणी करण्यासाठी आलेले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे निवेदन देण्यात आले.
मुल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, घरांची पडझड झालेल्या नागरिकांना ३० ते ४० हजारांची तात्काळ मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांना पीक विमा लागू करण्यात यावा, वीज पडून मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ५ लाख रुपयांचा आर्थिक मोबदला देण्यात यावा, बोरचांदली येथील विद्युत प्रवाहामुळे जनावरांचा मृत्यु झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना प्रती नग ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी, वाघांच्या भीतीपोटी ज्या शेतकऱ्यांनी शेत जमिनी पडीत ठेवलेल्या आहेत त्यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्यात यावी, जंगली प्राण्यांनी अनेकांच्या शेतातली पिकांची नासधूस केली त्यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्याकरिता आपल्या स्तरावरून प्रयत्न करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, मुल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम येणुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, संदीप कारमवार, किशोर घडसे, रुमदेव गोहने, सुमित आरेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.