अग्निपथ योजना परत घ्या – काँग्रेसची मागणी

62

मुल – केंद्र सरकारने आणलेली अग्निपथ योजना फसवी असल्याने ती तात्काळ बंद करावी. या मागणीसाठी मुल तालुका युवक काँग्रेसनी मोर्चा काढला असून गांधी चौकातील काँग्रेस भवन ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा निघाला. मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारने सुरु केलेली ! अग्निपथ योजना ही देशाला अतिशय घातक असून देशातील युवक तरुणांना देशोधडीला लावणारी आहे.

या योजनेमुळे देशाचा व सुरक्षेचा कोणताही फायदा होत नसून केवळ युवकांना वेठबिगार बनवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. या योजने विरोधात देशातील तमाम युवकांनी व बहुतांश पक्षांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असून नियमित सैनिकांचे खच्चीकरण करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. ही बाब देशासाठी अतिशय धोकादायक असून केंद्र सरकारने ही योजना तात्काळ बंद करून देशाला व आजच्या युवकांना नियमित सैनिक भरतीसाठी प्रोत्साहन द्यावे व ही योजना तत्काळ बंद करावी असे निवेदन देण्यात आले.

ही योजना तात्काळ बंद झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन युवक काँग्रेस तालुका मुल कडून करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चात युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन निलावार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम येनूरकर, राकेश रत्नावार, रूपाली संतोषवार, सुनील शेरकी, लीना फुलझेले, विवेक मुत्यलवार, फरजाना शेख, विनोद कामडी, कैलास चलाख इत्यादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.