मानवावर हल्ला करणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करुन मानवाला संरक्षण द्यावे अशी मागणी परिसरात ग्रामस्थांनी

58

मुल-मुल तालुक्यातील मुल पासून ६ की.मी. अंतरावर असलेल्या काटवन बिटातील वन विभागाच्या बफर क्षेत्रातील कक्ष क्रमांकावर ७५६ च्या वनव्याप्त जंगलाला लागून असलेल्या शेतात मजुरीचे काम करीत असलेला शेतमजूर श्री. रामभाऊ कारु मरापे वय ४३ यांचेवर शेता लगत जंगलात दबा धरुन असलेल्या वाघाने शेतमजुरावर हल्ला करुन ठार केल्याची घटना आज सकाळी ८ च्या दरम्यान घडली.

मरापे याचा मृतदेह जवळच असलेल्या नाल्यालगत असल्याचे वनविभागाच्या अधिकारी यांनी सांगितले. हा परिसर संपूर्ण जंगलव्याप्त असून याभागात नेहमीच वन्य प्राण्यांचे वावर आहे. सध्या शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी व शेतमजूरांना आपल्या पोटाच्या भाकरीसाठी शेतात जाणे भाग पडते. परंतु वाघाच्या दहशतीमुळे जंगलव्याप्त गावात शेती करणे कठीण होत असल्याची चर्चा करवन काटवन गावात केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र सहायक श्री. जोशी, बिट वनरक्षक वासेकर, परचाके, हे घटनास्थळी रवाना होऊन काही गावकऱ्यांच्या समक्ष पंचनामा करुन प्रेत शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मुल येथे आणण्यात आले असून वन विभागातर्फे मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ २५ हजाराची मदत देण्यात आली. मृतकास पत्नी, सह परिवार आहे. मे महिन्यात मागील १५ तारखेला याच जंगलाला लागून असलेल्या सोमनाथ प्रकल्पात लगत तेंदूपत्ता तोडणीला गेलेल्या इसमास वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजीच आहे. मानवावर हल्ला करणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करुन मानवाला संरक्षण द्यावे अशी मागणी परिसरात ग्रामस्थांनी केली आहे.