कोरोना नाही या अफवेवर नागरीकांनी विश्वास ठेवु नये सहायक पोलीस अधिक्षक अनुज तारे यांचे आवाहन

41

 

मूल – कोरोना नाही हे कारस्थान आहे. अश्या आशयाचे काही समाज माध्यमांवर प्रसारीत होणारे मँसेज चुकीचे असुन जनतेच्या जीवीताशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामूळे यावर विश्वास न ठेवता संस्कृती आणि परंपरेप्रमाणे सण आणि उत्सव साजरे करतांना नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक नियम आणि कायदा व सुव्यवस्थेच्या पालना सोबतचं सामाजीक व विधायक उपक्रम राबवुन प्रशासनाला सहकार्य करण्याचा आदर्श निर्माण करावा. असे आवाहन सहायक पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी केले. पोलीस उपविभाग मूलच्या वतीने स्थानिक कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजीत शांतता समितीच्या सभेत ते बोलत होते.
पोलीस उपविभागा अंतर्गत येणा-या मूल, सावली, पाथरी, पोंभुर्णा, गोंडपिपरी आणि उमरी पोतदार पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळ, पोलीस पाटील, प्रतिष्ठीत नागरीक, व्यापारी आणि शांतता समितीच्या सदस्यांची सभा आज पार पडली. यावेळी मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, न.प.सभापती प्रशांत समर्थ, न.प.मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, विज वितरण कंपनीचे शाखा अभियंता कृपाल लांजे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता जयंत साखरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल टहलीयानी, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे आदि उपस्थित होते. नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांचे हस्ते दिप प्रज्वलन आणि श्री गणेशाच्या आरतीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी कला निकेतनच्या संतोषी बत्तुलवार, सानिया शेख, आस्था कामडे, सेजल गणवीर आणि भक्ती राजा यांनी स्वागत गीत सादर केले. मूलचे ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांनी प्रास्ताविका मधून सर्व धर्म समभाव राखून सूचना,नियम कायद्याचे पालन करावे अशी सहकार्याची अपेक्षा जनतेकडून केली. न.प.मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी १८८९ साली लो.टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवावर प्रकाश टाकतांना तोंडावर आलेला गणेशोत्सव सार्वजनिक गणेश मंडळाने विधायक आणि लोकोपयोगी उपक्रम राबवून लोकोत्सव साजरा करावा, नियमाचे पालन करून न.प.प्रशासनाला सहकार्य करावे असे मत व्यक्त केले, आणि विसर्जनाच्या ठिकाणी कृत्रिम कुंडी,व इतर व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले. यावेळी विज वितरण कंपनीचे शाखा अभियंता कृपाल लांजे यांनी गणेशोत्सवात विजेपासून अपघात टाळण्यासाठी एम.सी.बी. व स्वतंत्र मीटर लावावे याबाबत माहिती दिली.
         आनंदाचा उत्सव असलेला गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरीकांनी कोरोना हा एक राक्षस आहे म्हणून त्याचा प्रतिबंधक नियमांचे पालन करून वध करुन जीवीताचे रक्षण करावे. असे आवाहन नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनी केले. यावेळी उपस्थित नागरीकांकडून आलेल्या प्रश्नांना मान्यवरानी समाधानकारक उत्तर दिली. कार्यक्रमाला सावलीचे ठाणेदार सिरसाट, पोंभुर्णाचे जोशी, उमरी पोतदारचे कुकडे यांचेसह उपविभागातील सहा पोलीस स्टेशन मधील पोलीस पाटील, सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, व्यापारी, आणि शांतता समितीचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संजय पडोळे यांनी केले. गोंडपिपरीचे ठाणेदार राजगुरू यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामुहिक राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. सपोनी मनोज गदादे यांचे मार्गदर्शनात उत्तम कुमरे, सचिन सायंकार, सुनिल घोडमोरे, चंद्रशेखर सिडाम, शालीनी नैताम, पौर्णीमा मडावी आणि सुरेश खोब्रागडे यांनी परिश्रम घेतले.