शिक्षकांसाठी मोठी बातमी, टीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

47

TET Certificate नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शिक्षकांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट प्रमाणपत्राची वैधता 7 वर्षांहून वाढवत त्या शिक्षकाच्या आयुष्यभरासाठी वैध ठरवली आहे. पोखरियाल यांनी शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमदेवारांसाठी आणि सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी महत्वाचा निर्णय असल्याचं म्हटलं आहे. (Central Education Ministry decided to extend TET certificate validity period)

शिक्षक पात्रता परीक्षा 2011 पासून अनिवार्य

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 2011 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेच्या प्रमाणपत्राची वैधता 7 वर्ष ठरवण्यात आली होती.

नव्यानं टीईटी प्रमाणपत्र देण्यात येणार

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियान निशंक यांनी केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकार ज्यांच्या टीईटी प्रमाणपत्रांची सात वर्षांची मुदत संपली आहे ती नव्यानं जारी करतील, असं सांगितलं. 2011 नंतर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं शिक्षक व्हायचं असेल तर आवश्यक करण्यात आलं होतं.

शिक्षक आणि उमेदवारांना मोठा दिलासा

शासकीय शाळांमधील शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना आणि ज्या शिक्षकांनी यापूर्वी टीईटीचं प्रमाणपत्र मिळवलं असेल पण मुदत संपली असेल त्यांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. 2011 नंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची प्रमाणपत्र आयुष्यभर वैध असतील. केंद्रीय शिक्षणमंत्री हा निर्णय शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना दिलासा देणारा असल्याचं म्हणाले.

 

सरकारी शाळांमध्ये किंवा अनुदानित शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवायची असेल तर टीईटी परीक्षा पास होणे गरजेचे आहे. तसेच जे शिक्षक नोकरी करतात त्यांनाही टीईटी पास होणे गरजेचे आहे. आधीच्या नियमानुसार 7 वर्षांच्या आतच तो उमेदवार शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज करू शकत होता. ती मुदत संपल्यावर पुन्हा टीईटी परीक्षा देणे बंधनकारक होते. आता हे टेन्शन मिटले आहे.