मुल तालुक्यातील जानाळा येथे वाघाच्या हल्ल्यात एक ठार

43

मूल (प्रतिनिधी)
तालुक्यातील जानाळा येथील किर्तीराम देवराव कुळमेथे (२४) या इसमास आज वाघांनी ठार केले. मिळालेल्या माहितीनुसार कीर्तीराम आपल्या जवळच्या नातेवाईकांसह प्रादेशिक वनपरीक्षेञ हद्दीतील चिरोली बिटा लगतच्या स्वतःच्या शेतात काही कामानिमित्य गेला असता रेल्वे मार्गालगतच्या झुडपी जंगला मधुन एका पट्टेदार वाघाने किर्तीरामवर हल्ला केला.

सोबतच या नातेवाईकाने कीर्तीरामला वाघाच्या तावडीतुन वाचविण्या साठी आरडाओरड करीत काठीने हाकलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस वाघ त्याच्या अंगावर धावुन येवु लागल्याने त्याने घटनास्थळापासुन काही दुर अंतरापर्यत पळून जावुन वाघाने किर्तीरामवर हल्ला केल्याची माहीती मोबाईलवरून गांवातील नातेवाईकांना सांगीतली. दरम्यान वाघाने किर्तीरामवर हल्ला केल्याची माहीती गावकऱ्यांना झाल्यानंतर शेकडो ग्रामस्थांनी किर्तीरामच्या शेताकडे धाव घेतली. तोवर वाघाने किर्तीरामला ठार केले होते.

मृतक कीर्तीरामचे पश्चात पत्नी दोन लहान मुले असल्याने गावात त्याच्या मृत्यु विषयी हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच जानाळा येथील वनिता गेडाम ह्या महिलेलाही वाघाने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तीच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असतानाच आज वनिता गेडाम हीचे निधन झाल्याने ग्रामस्थांमध्ये वन विभागा विरूध्द तिव्र रोष निर्माण झाले आहे. वाघाचा बंदोबस्त करावा आणि मृतकांच्या कुटूंबियांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी.

अशी मागणी करीत मृतक किर्तीराम कुळमेथे याचे पार्थीवही शव विच्छेदना करीता नेण्यास ग्रामस्थांनी वन आणि पोलीस प्रशासनाला तिव्र विरोध केला. घटनास्थळी सहाय्यक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावाड, विभागीय वनाधिकारी सारीका जगताप, प्रभारी वन परीक्षेञ आधिकारी तावाडे, वनरक्षक राकेश गुरनुले आणि रोगे, पर्यावरण प्रेमी उमेशसिंह झिरे यांचेसह पोलीस कुमक उपस्थित होती,

वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन उद्या वाघाचा वावर असलेल्या स्थळी पिंजरे लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतक किर्तिराम कुळमेथे याचे पार्थिव शव विच्छेदना करीता प्रशासनाच्या स्वाधीन केले. मृतक किर्तीरामच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन लहान मूल आहेत.